पुणे प्रतिनिधी :
पुणे जिल्हा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) यांच्या वतीने केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी चार कामगार संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस INTUC महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शांततामय मार्गाने पार पडले. कामगार हिताच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले २९ कायदे रद्द करून चार नवीन कामगार संहिता लागू केल्यामुळे कामगारांचे वेतन, नोकरीची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा व संघटन स्वातंत्र्यावर गदा येत असून कामगारांच्या संविधानिक हक्कांना धोका निर्माण झाल्याची तीव्र भावना कामगार वर्गातून व्यक्त करण्यात आली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे जिल्हा INTUC जिल्हाध्यक्ष मा. विजय सुदामराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये पुणे शहर अध्यक्ष मा. अग्रवाल साहेब, हिंद कामगार संघटनेचे सुपेकर साहेब तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष दीपक पकाले, उपाध्यक्ष गोविंदराव अटक, सरचिटणीस संग्राम जाधव, खजिनदार पिंकी जाधव, प्रवक्ते नितीन चव्हाण, मोहन शिंदे, संघटक गंगाराम शेगर, दत्ता शिंदे, जिल्हा समन्वयक दगडू पवार, मोहन निंबाळकर, श्री पवार साहेब, संतोष चुकते, सचिन गंगावणे तसेच शेकडो महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांचा तीव्र निषेध करण्यात आला. पुणे जिल्हा INTUC कडून पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डूडी साहेब यांना निवेदन देण्यात आले. कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत, रद्द करण्यात आलेले कामगार कायदे पुन्हा लागू करावेत तसेच कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.